येरवडा येथे पहेलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आक्रोश मोर्चा



येरवडा परिसरात पहेलगाम येथील हल्ल्याच्या तीव्र निषेधार्थ उत्तर भारतीय मोर्चाच्या वतीने भव्य आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चात स्थानिक नागरिक, युवक तसेच महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सहभागी नागरिकांनी हातात फलक, तिरंगा आणि देशभक्तीचे घोषवाक्ये देत हल्ल्याचा निषेध नोंदवला.
मोर्चाचे नेतृत्व उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष ॲड. सुरज दुबे यांनी केले. त्यांनी या प्रसंगी देशातील जवानांवर होणाऱ्या हल्ल्यांचा तीव्र निषेध व्यक्त करत, देशाच्या सुरक्षेसाठी सर्व नागरिकांनी एकत्र यावे असे आवाहन केले. त्यांच्या सोबत विशेष सहकार्य म्हणून आकाश दुबे, बबलू गलियाल, चैतन्य मोझे, शुभम दुबे, तारकेश्वर सिंग, राजेश पाठक, नवनीत पांडे, संतोष भाऊ शेंडगे आणि अनिल झेंडे उपस्थित होते.
या मोर्चादरम्यान नागरिकांनी शांतीपूर्ण पद्धतीने निषेध नोंदवला आणि शहिद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. अनेक लहान मुलांनी तिरंगा हातात घेत देशभक्तीपर गीते गायली आणि ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांनी देशात ऐक्य, शांतता आणि देशप्रेमाचे वातावरण टिकवण्याचे आवाहन केले. तसेच अशा हल्ल्यांविरोधात सर्व समाजघटकांनी एकत्र येऊन देशाच्या सुरक्षेसाठी योगदान द्यावे, अशी भावना व्यक्त केली.
