May 10, 2026

सामाजिक संवेदनशीलता, जनभावनेला प्राधान्य आवश्यक-डॉ.हुलगेश चलवादी

दिनांक ९ एप्रिल २०२६, पुणे:-

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) चे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा.रामदास आठवले साहेबांनी बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याच्या आवाहनाचे पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.हुलगेश चलवादी यांनी समर्थन केले आहे. लोकशाहीत प्रत्येक पक्षाला निवडणूक लढवण्याचा घटनात्मक अधिकार असला, तरी काही प्रसंगी सामाजिक संवेदनशीलता आणि जनभावनेला प्राधान्य देणे आवश्यक असते, असे मत व्यक्त करीत डॉ.चलवादी यांनी काँग्रेसच्या भूमिकेवर टीका केली.

अजित दादा यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात दिलेले योगदान मोठे असून, त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबीयांप्रती आदर व्यक्त करण्याची ही वेळ होती.अशा परिस्थितीत सुनेत्रा वहिनींविरोधात उमेदवार न उभा करता निवडणूक बिनविरोध करण्याचा विचार हा महाराष्ट्राच्या परंपरेला साजेसा ठरला असता, अशी भूमिका मा.आठवले साहेबांची असल्याचे डॉ.चलवादी यांनी नमूद केले. सुनेत्रा वाहिनी या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री असून त्यांना बिनविरोध निवडून देणे हा त्यांचा सन्मान ठरेल. हीच अजित दादांना खरी श्रद्धांजली असेल, अशी पक्षाची भूमिका असल्याचे डॉ.चलवादी म्हणाले.

आरपीआयच्या (आ) भूमिकेचा पुनरुच्चार करताना डॉ.चलवादी म्हणाले की, ही केवळ राजकीय लढाई नसून सामाजिक मूल्ये आणि कृतज्ञतेची जाणीव जपण्याचा विषय आहे. काँग्रेस पक्षाने या प्रसंगी उमेदवार उभा करून जनभावनांचा विचार न करता राजकीय निर्णय घेतला असून, हे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत परंपरेला धरून नाही.जनतेच्या भावना ओळखून निर्णय घेणे हेच खरे नेतृत्व असते आणि मा.आठवले साहेबांनी दाखवलेली भूमिका ही याच मूल्यांची जोपासना करणारी आहे. येणाऱ्या निवडणुकीत जनतेकडून या भूमिकेला निश्चितच प्रतिसाद मिळेल, असा विश्वासही डॉ.चलवादी यांनी व्यक्त केला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button