बहारदार सूत्रसंचालनाने कवीप्रेमींना मंत्रमुग्ध; मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शाल व सन्मानपत्र प्रदान
पुणे : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद संचलित कला गोविंद शिक्षण प्रसारक मंडळ व पोलीस मित्र संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने उरुळी कांचन येथील रवींद्र कला मंदिर येथे दिनांक १० मे २०२६ रोजी ८ वे राज्यस्तरीय कविसंमेलन उत्साहात पार पडले. या कविसंमेलनात कवी, साहित्यिक, निवेदक तथा नोटरी भारत सरकार अॅड. उमाकांत आदमाने यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
या कविसंमेलनाचे आयोजन प्रा. सुरेश वाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रपती पोलिस पदक मानकरी लोककवी सिताराम नरके हे होते. तसेच जेष्ठ कवी व साहित्यिक प्रा. डॉ. शैलेंद्र भणगे, के.डी. बापू कांचन,जेष्ठ कवी सूर्यकांत नामगुडे, वनअधिकारी तथा जेष्ठ कवी लक्ष्मण शिंदे, जेष्ठ कवी/साहित्यिक किशोर टिळेकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, भजन आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूजनाने करण्यात आली. यानंतर स्वागतगीत तसेच मान्यवरांचा सत्कार संपन्न झाला. संस्थेच्या वतीने १० कवी व कवयित्रींना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. कविसंमेलनाच्या दुसऱ्या सत्रात तब्बल ६५ कवींनी आपल्या कविता सादर करून रसिकांची दाद मिळवली.
या संमेलनाचे आकर्षण ठरले ते अॅड. उमाकांत आदमाने आणि रानकवी श्री. जगदीप वनशिव यांचे प्रभावी व बहारदार सूत्रसंचालन. आपल्या आवाजातील जादू, उत्कृष्ट शब्दफेक आणि निवेदन कौशल्यामुळे अॅड. आदमाने यांनी उपस्थित कवीप्रेमींना मंत्रमुग्ध केले.

त्यांच्या उल्लेखनीय सूत्रसंचालनाची दखल घेत जेष्ठ साहित्यिक व मान्यवरांच्या हस्ते अॅड. उमाकांत आदमाने यांना आकर्षक सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व शाल प्रदान करून गौरविण्यात आले. या सन्मानामुळे साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत व्यक्तींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
